आठ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
अमरावती : तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधा आणि अनुसूचित जाती वस्त्यांमधील प्रलंबित समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होत असून, अनुसूचित जाती वस्त्यांमधील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दापोरी येथील बंद असलेला आरओ प्लांट तातडीने सुरू करण्यासाठी त्याची चौकशी करून नागरिकांच्या सोयीसाठी तो कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती वस्त्यांमधील रस्त्यांवर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वरूडा येथील अनुसूचित जाती वस्तीत उभारण्यात आलेला पूल अवघ्या एका वर्षात खचून पडल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पावसाळ्यात साथीचे आजार आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात नियमित धूरफवारणी करण्यात यावी, यासह इतर विविध मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांची आठ दिवसांत पूर्तता करावी, अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला.
निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते, तालुका अध्यक्ष मनीष खरे, जिल्हा सदस्य विनोद खाकसे, प्रमोद मुंद्रे, उपाध्यक्ष नितीन थोरात, सिद्धार्थ कटारने, भुजंग वावरे, अनिल गाडगे, श्रीकृष्ण वावरे, सचिन बाखडे, अभिषेक मनोहरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





