सोलापूर : गेल्या तीन महिन्यांपासून अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पशुपालक आणि व्यापारी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही जिल्ह्यातील नदी, धरणे, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिकांची उगवणच झालेली नसून, दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई व मदत निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
पाणीटंचाईची परिस्थितीही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये २० ते २५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.
दरम्यान, पाण्याअभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे पशुधनासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करून मुक्या जनावरांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याने शासनाने रोजगाराच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





