अकोला :भारिप-बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीसाठी अकोला जिल्ह्यात आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मनकर्णा शिरसाट यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनावर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करत, चळवळीतील एका निष्ठावान पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
अंजलीताईंनी शिरसाट यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सम्यक भारिपच्या कालखंडापासून ज्या कार्यकर्त्यांनी आणि कुटुंबांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते, त्यातील मनकर्णा शिरसाट हे एक महत्त्वाचे नाव होते. त्या काळी एस.टी.ने प्रवास करून किंवा पायी फिरून प्रचार करणे, बैठकांसाठी रात्रीतून १००-१०० पत्रे हाताने लिहून काढणे, मोर्चे आणि आंदोलने यात त्या सदैव अग्रभागी असत.
निवडणूक लोकसभेची असो किंवा ग्रामपंचायतीची आणि उमेदवार कोणत्याही समाजाचा असो, शिरसाट यांचा जोश कधीही कमी होत नसे.चळवळ उभी करताना लागणारी जिद्द आणि वैचारिक बांधिलकी त्यांच्यात उपजत होती. विशेष म्हणजे, इतके कष्ट करूनही त्यांच्या मनात कोणताही अभिनिवेश किंवा सत्तेची अपेक्षा नव्हती; असायचा तो केवळ आपला पक्ष जिल्ह्यात सत्तेत असल्याचा निखळ अभिमान.
त्यांच्या निधनाने चळवळीचा एक कष्टकरी आणि निस्वार्थ आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. अंजलीताई आंबेडकर यांनी त्यांना आदरपूर्वक प्रेमाचा आणि मानाचा जयभीम अर्पण केला आहे.





