औरंगाबाद : अनुसूचित जाती आणि जमातीच्या (एससी-एसटी) विकासासाठी राखीव असलेला ₹४६०१.१३ कोटींचा निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्यात आल्याचा तीव्र निषेध नोंदवत अनुसूचित जाती, जमातीच्या समूहांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या औरंगाबाद येथील घरावर तर आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घरावर धडक मोर्चा नेला.
औरंगाबाद येथील आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी राज्य सरकारवर थेट हल्लाबोल केला. एससी-एसटीच्या निधीचा काय घोटाळा केला, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी रोखठोक भूमिका पातोडे यांनी मांडली. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवून मागासवर्गीय समाजाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप करत आंदोलकांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाला असून यात SC, ST समूहांचा निधी पळवण्यात आला तसेच राज्य सरकारने या योजनेसाठी मोठी तरतुद करून 1500 कोटी रुपये अतिरिक्त ठेवले होते, असे असतांना ही आदिवासी विभागातून 1 हजार कोटी रुपये तर समाज कल्याण विभागातून 3500 कोटी रुपये पळवले आहेत. राज्य सरकारच्या ह्या योजनेवर केंद्र सरकारच्या कॅगने यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. औरंगाबाद येथील मोर्च्यात पोलिसांनी विनाकारण आंदोलनकर्त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
दुसरीकडे यवतमाळ येथेही वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात एससी-एसटी समाजाने आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या घरावर मोर्चा नेला. एससी-एसटीच्या हक्काच्या ₹४६०१.१३ कोटी निधीची लूट करणाऱ्या कमिशनखोर धोरणाचा धिक्कार करत आंदोलकांनी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ येथील घरासमोर निदर्शने सुरू केली आहेत. राज्य शासनाने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, प्रा. नागोराव पांचाळ, जितरत्न पटाईत, दीपक डोके, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिवे, नगरसेवक अमित भुईगळ, नगरसेविका करुणा जाधव, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे, पंकज बनसोडे, सतीश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक, कार्यकर्ते उपस्थित होते.






