साकोली (भंडारा) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाथोडे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ७ ऑगस्ट हा ‘मंडल आयोग विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर साकोली येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी भंडारा (तालुका साकोली) यांच्या संयुक्त विद्यमाने मंडल आयोग विजय दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
७ ऑगस्ट १९९० हा भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील अत्यंत सुवर्णमय दिवस मानला जातो. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान कै. विश्वनाथ प्रताप सिंह (व्ही. पी. सिंह) यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. या धाडसी निर्णयामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांना (OBC) २७% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला.
याप्रसंगी आयोजित सभेत वक्त्यांनी सांगितले की, काँग्रेस सरकारने प्रदीर्घ काळ मंडल आयोगाचा अहवाल अंमलात आणला नव्हता. मात्र, व्ही. पी. सिंह यांनी स्वतःच्या सरकारची पर्वा न करता सामाजिक न्यायाचे वचन पूर्ण केले. या निर्णयामुळे भाजप सरकारने आपला पाठिंबा काढून घेतल्याने व्ही. पी. सिंह यांचे सरकार पडले, तरीही त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या हक्काशी तडजोड केली नाही.
तसेच केंद्रीय मंत्रीपद नाकारून बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून घेण्यात बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची होती. या कार्यक्रमाला साकोली तालुक्यातील बहुसंख्येने ओबीसी बांधव व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्यासह यादवराव गणवीर, अमित नागदेवे, जगदीश रंगारी, गणेश गजभिये, केवलराम उके, शिवप्रसाद मेश्राम, जोश्ना खोब्रागडे, प्रेमचंद खोब्रागडे, सरिता डोंगरे, पारधी मॅडम, खेमू मोटघरे, बबीता राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





