राहुरी: राहुरी नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांना निवासी जागा आणि शासकीय घरकुल योजना मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आदिवासींच्या बिऱ्हाड आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि तिची आदिवासी विंग ‘एकलव्य वंचित आघाडी’ यांच्या वतीने ९ सप्टेंबर २०२६ रोजी राहुरी नगरपालिकेवर या बिऱ्हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
एकलव्य वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या ५३ वर्षांपासून राहुरी शहरातील आदिवासी भिल्ल समाजातील एकाही कुटुंबाला हक्काचे घरकुल मिळालेले नाही; हे नागरिक खाजगी जागा, पाटबंधारे विभागाची जागा किंवा कचरा डेपोच्या परिसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. आदिवासी विकास महामंडळाचा निधी इतरत्र वळवला जात असल्याचा आरोप करत, नगरपालिकेने हद्दीत १५ ते २० एकर जमीन विकत घेऊन सर्व सुविधांसह शासकीय घरकुल योजना राबवावी, जेणेकरून घराचा, शिक्षणाचा, वीज व नळ कनेक्शनचा प्रश्न सुटेल, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव (आबा), एकलव्य वंचित आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिलराव जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष दादा चोळके, जिल्हा संघटक बाबासाहेब साठे, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महिला तालुकाध्यक्षा अनिताई जगधने, आयनुरताई पठाण, सय्यद मॅडम, नवनिर्वाचित अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा आशाताई माळी, कविताताई पवार, गणेश माळी, नारायण माळी, सिताराम माळी, पिंटू नाना साळवे, जितू बर्डे, प्रदीप गवळी, सुनिता बर्डे, शंकर बर्डे, रवी माळी यांच्यासह राहुरी शहरातील आदिवासी भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल घेतल्याने या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.






