मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा तीव्र इशारा दिला आहे.
खासगी कंपन्यांना समांतर वीजपुरवठा परवाना देणे हे वीज मंडळाच्या खासगीकरणाची सुरुवात आहे. सरकारने हे समांतर परवाने देऊ नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने हे धोरण न बदलल्यास वंचित बहुजन आघाडी या खासगीकरण धोरणाविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आहे की, राज्यात समांतर वीज परवाना, स्मार्ट मीटर योजना आणि २०० कोटींवरील महापारेषणचे प्रकल्प टी.बी.सी.बी.पद्धतीने देण्याचे धोरण हे महावितरणआणि महापारेषण कंपनीच्या खासगीकरणाचाच एक भाग आहे.
महावितरणनेही मुंबई शहरातील कुलाबा, माहीम, बांद्रा, दहिसर अशा एकूण १३ क्षेत्रांमध्ये वीज वितरणासाठी परवाना अर्ज दाखल केला आहे, यालाही वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या खासगीकरण धोरणाविरोधात विद्युत क्षेत्रातील विविध कामगार संघटनांचे एकत्रित संघटन असलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मंगळवारी महावितरणसह शासनाला राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या संपाला आणि आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील असे जाहीर केले.
तसेच, महावितरणच्या खासगीकरणाचे हे धोरण हाणून पाडण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने महाराष्ट्रात आंदोलन केल्यास त्यांना कायदेशीर मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये महावितरणला ‘पर्याय’ उभा करण्याचे सरकारी धोरण यशस्वी होऊ दिले जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले