पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भटके विमुक्त राज्यस्तरीय परिषदेत बोलताना भटक्या-विमुक्त समूहाला स्वाभिमानाची आणि राजकीय जागरूकतेची हाक दिली आहे. निवडणुकीतील पैशांच्या लाचार राजकारणावर कडाडून हल्ला चढवत त्यांनी समाजाला स्वतःच्या हक्कांची आणि ताकदीची जाणीव करून दिली.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर आपल्याला स्वतःच्या कष्टाने दिवसातून दोन वेळचे जेवण हक्काने मिळते आणि कोणापुढेही हात पसरण्याची गरज पडत नाही, तर मग निवडणुकीत मतदानाच्या दिवशी आपण कोणासमोर हात का पसरवतो? आपण खाऊन-पिऊन सुखी असताना आणि कोणावरही अवलंबून नसताना केवळ पैशांसाठी मते विकणे हे अत्यंत खेदजनक आहे. ही लाचारी आणि गुलामीची मानसिकता आता भटक्या-विमुक्त समूहाने कायमची सोडून दिली पाहिजे.
गावागावांतील भटक्या-विमुक्त समूहाने एकत्र येऊन निवडणुकीत वाटले जाणारे पैसे स्वीकारणार नाही आणि आपला ईमान कधीही विकणार नाही, अशी ठाम आणि खंबीर भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या दिवशी हा समाज ही स्वाभिमानाची भूमिका घेईल, त्या दिवशी भटक्या-विमुक्तांच्या हक्काच्या बजेटचे तब्बल ४१ हजार कोटी रुपये कोणाकडेही न मागता आपोआप मिळतील, असा विश्वासही त्यांनी या परिषदेत व्यक्त केला.





