नागपूर – स्वातंत्र्यापासून देशातील मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवले गेले आहे. पाकिस्तानातील आणि भारतीय मुस्लिमांमध्ये मूलभूत फरक असूनही, त्याकडे डोळे झाक केली जात आहे. देशातील मुस्लिमांना या भूमिकेतून कधी मुक्त करणार? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गढीमध्ये उपस्थित करत खळबळ उडवून दिली.
नागपूरच्या कस्तुरचंद पार्कजवळील परवाना भवन येथे ‘फुले-आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरम’तर्फे आयोजित “ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी” या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, “भारतीय मुस्लिमांमध्ये संतपरंपरेची वैचारिक समृद्धी आहे, जी पाकिस्तानात नाही.
तरीही देशात धर्मांध शक्ती मुस्लिमांविरोधात सातत्याने प्रचार करत आहेत. स्वातंत्र्यानंतरही मुस्लिमांना दहशतवादाशी जोडून त्यांना ‘व्हिलन’ ठरवले जाते. देशात ७५ वर्षांपासून ही भूमिका टिकून आहे, ती कधी संपणार? त्यांनी इशारा दिला की, “भारतीय मुस्लिमांविषयीची भूमिका बदलली नाही, तर समाजात संघर्षाच्या रेषा आणखी खोल जातील आणि त्यातून मोठे भगदाड निर्माण होईल. तसेच त्यांनी सध्याच्या सनातनी विचारांच्या नेतृत्वावर टीका करत, अविकसित समाजाचे नेतृत्व हे गुळगुळीत आणि ढिसाळ राजकारण घडवते, असे स्पष्ट केले.
काश्मीर धोरणावरून बाबासाहेबांच्या पराभवाची आठवण लोकसभा निवडणुकीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाची आठवण करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “काश्मीरबाबत बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली होती.
एकतर काश्मीर पूर्णतः घ्या किंवा त्यावर कायमची पूर्णविराम द्या. पण तत्कालिन राजकीय पक्षांनी त्यांच्या भूमिकेला विरोध करत त्यांना निवडणुकीत पाडले. पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेऊन देशाला दीर्घकाळाचा त्रास दिला. आजही आपण त्या धोरणाचा फटका भोगतो.” अखेर, “राजकारण हे देशाच्या हितासाठी असावे, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी नव्हे,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.