पुणे : प्रधानमंत्री मोदी यांचा विदेश दौरा हा इटलीसाठी होता. देशात पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांचे खतांचा तुटवडा मोदी यांच्या धोरणामुळे आहे. इटली जाण्याचा उद्देश हा, इटलीने भारतातून गेलेले 4 जहाज थांबवले आहेत. या जहाजात जवळपास 800 टन मिलिटरी ग्रेडेड स्टील यात आहे. या साहित्याचा उपयोग पॅलेस्टाईन विरोधात गाझा पट्टीमध्ये केला जाऊ शकतो म्हणून यावर इटलीने रोख लावली, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड .आंबेडकर म्हणाले, जर हा माल इस्रायल गेला तर यातून जवळपास 17 हजार शेल्स बनवले जातील, ज्याचा वापर गाझा पट्टीवर केला जाईल. त्यामुळे इटली सरकारवर तेथील पोर्टमधील कामगार संघटनांनी दबाव आणून हे जहाजे रोखून धरले आहेत. भारतातून इस्रायलला हा मिलिटरी स्टील पोहचवले जातंय. इराणला ही गोष्ट समजल्यामुळे त्यांनी भारताला तेल देण्याचे कमी केले. ही गोष्ट जगाला कळू नये म्हणून पंतप्रधान मोदी इटलीला गेले आहेत. पंतप्रधान मोदीचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्यानंतर प्रत्येक देश त्यांच्यावर दबाव टाकतोय.
भारताला जे क्रूड ऑइल यायला पाहिजे होतं, त्याचबरोबर लिक्विफाईड नॅचरल गॅस यायला पाहिजे होता. अमेरिका-इराण युद्ध चालू असताना ते व्यवस्थित येत होत. पण, युद्ध संपल्यावर आपल्याला या सर्वांचा तुटवडा दिसतोय. याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, “इटली मध्ये दोन संघटना आहेत. एक Boycott, Divestment, and Sanctions (BDS) आणि NHB (No Harbour for Genocide) या दोन्हीही संघटना इस्राएलकडे कोणतेही शस्त्र, मिलिटरी ग्रेडेड जाऊ नये यासाठी लक्ष देतात. या दोन संघटनांच्या लक्षात आले आहे की, भारत मोठ्या प्रमाणात इस्राएलला मिलिटरी ग्रेडेड स्टील पाठवत आहे. ही पुरवठा करणारी कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्र, औरंगाबाद – जालना असे त्यांनी नमूद केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून चार जहाज सुद्धा गेले आहेत. त्यांना इटलीमध्ये पकडले आहे. इटली सरकार ते सोडत नाहीत. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून हे भारताला अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी चुकीचं केलेलं आहे ते लपवण्यासाठी जो देखावा केला की, मोदी हॉलंड, नॉर्वे मध्ये जाऊन मग येता येता इटलीमधून येणार. पण त्याचा खरा अर्थ त्यांना इटलीमध्ये जायचे होते. यामागे दोन मुद्दे होते, त्यापैकी एक म्हणजे ज्या बोटी पकडण्यात आले आहेत, त्या सोडविणे आणि दुसर, याच एका लक्ष्मी कंपनीच्या सह कंपनीने फॉर एव्हर केमिकल नावाचं केमिकल तयार केले आहे. त्याची फॅक्टरी त्यांनी इटलीमध्ये उभी केली आणि ही कंपनी उभी करणाऱ्या सर्व मालकांना जेल झाली आहे. ही फॅक्टरी लक्ष्मी कंपनीने विकत घेऊन रत्नागिरीमध्ये उभी करत आहेत. या केसची कोर्टाचे पेपर मिळू नयेत यासाठी विनंती करण्यासाठी आपले पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधानांना करत होते.
” एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव आल्यापासून ते विचित्र वागत आहेत. मिलिटरी ग्रेडेड मटेरियल भारताकडून इस्राएलला पोहचवले जातंय, हे अमेरिकेला चांगलं वाटलं असेल. पण, ज्या देशातून आपल्याला गॅस येतो, कच्चं तेल येते, त्या देशांकडून नाराजी व्यक्त झाली आणि त्यांनी आपली भरलेली जहाज सोडलेली नाहीत. शेतीची खते, सल्फर सुद्धा भरलेली आहेत. पण, ते जहाज सुद्धा सोडले गेले नाहीत. याकडेही ॲड. आंबेडकरांनी लक्ष वेधले.
भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत बोलताना ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, भारताचा जुना मित्र रशिया आपल्याला मदत करायला तयार नाही. चीन भारतावर दबाव टाकायला सुरुवात करत आहे. त्यामुळे आपण चारही बाजूंनी घेरले जात आहोत. तेव्हा मोदींनी परराष्ट्र धोरण का बदललं आणि लपून छपून तुम्ही इस्राएलला मिलिटरी ग्रेडेड स्टील का पुरवत आहात ? हा प्रश्न त्यांना जनतेने विचारला पाहिजे, असे आवाहन ॲड. आंबेडकरांनी जनतेला केले. तसेच राजकीय पक्ष सुद्धा हा प्रश्न विचारतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी यावेळी विरोधी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला खेदाने म्हणावे लागत की, जे काम इथल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केले पाहिजे. ते काम तो करतचं नाहीये. इटलीच्या वर्तमानपत्रात ही सर्व माहिती आली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याच्या आजी – आजोबाच्या घरातून ही माहिती आलेली आहे. जी माहिती जगाला पुरवली ती नातवाला सुद्धा पुरवली असेल. पण नातवाने ती माहिती उचलली नाही असे दिसते. म्हणून आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय मुद्यांना उपस्थित करून चर्चा सुरू करावी लागते.
देशातील जनतेने पंतप्रधान मोदी यांना विचारले पाहिजे की, देशाचे परराष्ट्र धोरण तुम्ही का बदलले ? एपस्टिन फाईलमध्ये तुमचं नाव आहे, त्यामध्ये पुढे अजून काही आहे का ? तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यावर बोलताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचा इटली दौरा हा ‘भीक मांगो’ अशा पद्धतीचा होता. हा दौरा भारताच्या हिताचा होता असे मी मानत नाही.
भारताचे सरन्यायाधीश न्या. सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान भारतातील तरुणांच्या संदर्भात जे वक्तव्य केले होते, त्यावर भाष्य करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, भारताच्या सरन्यायाधीशांनी आता सरळ देशातील तरुणांची माफी मागितली पाहिजे. तेवढे धैर्य त्यांनी दाखवले पाहिजे.




