पैठण : जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “दिव्यांग कल्याण ५% सेस निधी योजना” प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती मनोरमा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
या योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी निधी राखीव ठेवला जातो. त्या माध्यमातून विविध प्रकारचे अर्थसहाय्य तसेच आवश्यक साहित्य वाटप केले जाते. मात्र, कार्यालयीन स्तरावरील उदासीनतेमुळे पैठण तालुक्यातील अंध, अस्तिव्यंग, मतिमंद, कर्णबधिर तसेच इतर दिव्यांग व्यक्ती आपल्या हक्काच्या योजनांपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने तात्काळ आर्थिक लाभ व इतर योजनांचा लाभ देऊन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे, जिल्हा सदस्य शेषराव निकाळजे, तालुका संघटक अभिजीत पाटील पवार, शहर महासचिव दत्ता वाहुळे, सुरेश केसापुरे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





