मुंबई : अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास 30 दिवसांची “परवानगी” दिल्याच्या वृत्तानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. भारताच्या व्यापार आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांवर अमेरिकेचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना थेट सवाल करत म्हटले की, आपले आर्थिक व्यवहार आता अमेरिका ठरवत आहे का?
रशियन तेल भारताला पुरवण्यास अमेरिकेने मान्यता दिल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला की, “परवानगी कोण देत आहे? आपल्या व्यापार करारांमध्ये आणि परराष्ट्र आर्थिक धोरणांमध्ये आपल्याला काहीही स्वायत्तता उरलेली नाही का? भारत अमेरिकेचे ५१वे राज्य बनले आहे का? आपले आर्थिक व्यवहार आता अमेरिका ठरवत आहे का?” (Prakash Ambedkar)
आंबेडकर यांनी पुढे आरोप केला की, स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिश साम्राज्याच्या सत्तेसमोर निष्ठा पत्करली होती. आज भारतीय जनता पक्ष त्या परंपरेलाच पुढे नेत अमेरिकेच्या आदेशानुसार काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांमध्ये स्वायत्तता टिकवली पाहिजे, अन्यथा देशाच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. (Prakash Ambedkar)
रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्तरावर तेल व्यापार आणि निर्बंधांचा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या भूमिकेचा दाखला देत भारताच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.






