मुंबई: प्रभादेवी परिसरात एका १९ वर्षीय तरुणाची जातीय द्वेषातून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंशू कुमार असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दादर पोलिसांनी २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला अंशू कुमार गेल्या दोन वर्षांपासून प्रभादेवी येथील एका चहाच्या टपरीवर काम करत होता. त्याच्यासोबत त्याच्याच गावातील वीरेंद्र पाल आणि इतर काही तरुण राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, अंशू हा आंबेडकरवादी विचारसरणीचा होता. तो वारंवार मनुवादी विचारांवर प्रश्न उपस्थित करत असे, ज्याचा राग उच्चवर्णीय समाजातील वीरेंद्र पाल आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात होता. या वैचारिक मतभेदातून सहा महिन्यांपूर्वीही अंशूला मारहाण करण्यात आली होती.
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी याच जातीय मानसिकतेतून अंशूला दारू पाजून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अंशूच्या मृतदेहावर डोळ्यांवर, डोक्यावर आणि गळ्यावर गंभीर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादर पोलीस ठाण्यात धडकले. २ फेब्रुवारी रोजी सकाळी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष राकेश बुवा कांबळे, मुंबई प्रदेश कार्यकारिणी सदस्य आकाश अशोक दोडके, माजी उपाध्यक्ष अशोक गुजेट्टी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अंशूचे वडील सोनेलाल यांच्यासह पोलिसांची भेट घेतली.
हा खून केवळ वादातून झालेला नसून तो जातीयवादी मानसिकतेचा आणि मनुवादी व्यवस्थेचा बळी आहे. या प्रकरणात अजून काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे, असा आरोप अंशूच्या वडिलांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे संबंधित टी स्टॉल मालकाने अंशूचा मृतदेह आणि त्याच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेशात नेण्यासाठी विमानाचा सर्व खर्च उचलला आहे. सोमवारी अंशूचे वडील आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन फतेहपूरकडे रवाना झाले.
पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, “अंशू कुमारला न्याय मिळेपर्यंत ही लढाई आम्ही कोर्टात लढणार,” असा निर्धार आकाश अशोक दोडके यांनी व्यक्त केला आहे.
prabhadevi-caste-hate-murder-19-year-old-anshu-kumar-accused-arrested






