अहमदनगर : नांदगाव (ता. जि. अहमदनगर) ग्रामपंचायतीच्या कारणापुरती ग्रामसभेत महावितरण कंपनीतर्फे बसवण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट प्रीपेड वीज मीटर’ला ग्रामस्थांनी एकमुखाने तीव्र विरोध दर्शवला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादण्याच्या महावितरणच्या धोरणाविरोधात ग्रामसभेत जोरदार चर्चा होऊन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तात्काळ बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
ग्रामसभेत ग्रामस्थांनी स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज बिलांमध्ये होणारी वाढ, ग्राहकांच्या हिताचे रक्षण न होणे, मीटरची अचूकता, तक्रार निवारणाची अस्पष्टता आणि भविष्यात सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक बोजा या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शासकीय धोरणानुसार स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. तरीही उपस्थित ग्रामस्थांनी यास स्पष्ट नकार दिला. सदर ग्रामसभेत वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर तालुकाध्यक्ष रविकिरण जोसेफ जाधव यांनी स्मार्ट मीटर बसवणे बंद करण्याचा ठराव मांडला, तर दत्तात्रय बाबुराव वर्पे यांनी त्यास अनुमोदन दिले.
या ठरावाची प्रत महावितरणच्या देहरे येथील संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे पुढील कडक कारवाईसाठी पाठवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव यांच्या समवेत दत्तात्रय बाबुराव वर्पे, संजय जाधव, प्रवीण जाधव, अशोक जाधव, सतीश जाधव, राजू सोनवणे, मुकुंद सोनवणे, पाराजी मोरे, पोपट जाधव, मनोज जाधव, दत्तात्रय पुंड, शाम पाटील सोनवणे, बाळासाहेब सोनवणे आदींसह ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






