गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करा: इम्तियाज नदाफ
सातारा : गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी माण आणि खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतीव्यवस्थेमध्ये गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. गायीला केवळ प्राणी न मानता ‘माता’ म्हणून आदर दिला जातो. तिचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दूध, गोमूत्र आणि शेण यांचा शेती तसेच मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून, गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
गाय ही शांतता आणि अहिंसेचे प्रतीक असल्याचे सांगत गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा दिल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, वंचित बहुजन आघाडीचे नेते इम्तियाज नदाफ, वंचितचे नगरसेवक तुषार बैले, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊदखान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सर्फराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सर्फराज बागवान, सोहिल मुल्ला आदींसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच इम्तियाज नदाफ यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.





