Lok Sabha Seats : केंद्र सरकारकडून लोकसभेच्या रचनेत मोठे बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ५४३ सदस्यांची असलेली लोकसभा पुढील काळात तब्बल ८१६ सदस्यांची होऊ शकते, असा प्रस्ताव चर्चेत आहे. या संभाव्य बदलामध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश म्हणजे सुमारे २७३ जागा राखीव ठेवण्याचाही विचार सुरू आहे. ही नवी रचना २०२९ च्या लोकसभा निवडणुकांपासून लागू होऊ शकते.
या प्रस्तावानुसार देशातील बहुतेक राज्यांमध्ये लोकसभा जागांची संख्या लक्षणीय वाढेल. महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या ४८ जागा वाढून ७२ होण्याची शक्यता असून, त्यापैकी २४ जागा महिलांसाठी राखीव असतील. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल मध्ये ४२ वरून ६३, बिहार मध्ये ४० वरून ६०, तर तामिळनाडू मध्ये ३९ वरून ५९ जागा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेश मध्येही जागांची संख्या २९ वरून ४४ पर्यंत वाढू शकते.
लहान राज्यांनाही या बदलाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या जागा २ वरून ३ होऊ शकतात. तर मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम यांना प्रत्येकी १ ऐवजी २ जागा मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रशासित प्रदेशांमध्येही वाढ अपेक्षित आहे. दिल्ली येथील जागा ७ वरून ११ पर्यंत जाऊ शकतात, तर जम्मू आणि काश्मीर मध्ये ५ वरून ८ जागा होण्याची शक्यता आहे. मात्र लडाख आणि पुदुच्चेरी यांसारख्या एकच जागा असलेल्या केंद्रशासित प्रदेशांबाबत अजून स्पष्ट चित्र समोर आलेले नाही.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी मतदारसंघांची नव्याने आखणी, म्हणजेच delimitation, केली जाईल आणि ती २०११ च्या जनगणनेवर आधारित असण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे देशाच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे असून, विशेषतः महिलांच्या राजकीय सहभागात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






