मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील तीन ते चार तास महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघरमध्ये ‘रेड अलर्ट’, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. आज (शुक्रवारी) पालघर जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या-नाल्यांना पूर आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या पावसामुळे शेतीकामांना वेग आला असून, 80 टक्के भात लावणी पूर्ण झाली आहे.
रायगडला ‘ऑरेंज अलर्ट’, महाड-पोलादपूरमधील शाळांना सुट्टी
रायगड जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. महाबळेश्वर परिसरात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
विदर्भातही पावसाची हजेरी
विदर्भातील अनेक जिल्ह्यांसह नागपूरमध्येही आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. एकंदरीत, पुढील काही तास राज्याच्या विविध भागांसाठी पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण करावी ― ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे : आदिवासी भटके विमुक्तांनी देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकीत आपल्या मतांची दहशत निर्माण केली पाहिजे तरच तुम्हाला तुमचे हक्क आणि...
Read moreDetails






