मनमाड: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी धडकताच, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनमाड शहरात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अभूतपूर्व जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या काही काळापासून शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे न्याय आणि संविधानाचा विजय झाला असल्याची भावना या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
मनमाड शहरातील प्रमुख चौकात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत परिसर दुमदुमून टाकला. “घेतला रे घेतला, राजीनामा घेतला -धर्मेंद्र प्रधान तो झाकी है, अभी नरेंद्र मोदी बाकी है ” अशा विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
या जल्लोष कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीसह सर्व समविचारी पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक व संविधान प्रेमी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडी चे शहराध्यक्ष विलास आहिरे, शहर सचिव अमोल केदारे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ऍड. आम्रपाली निकम, जिल्हा सचिव कदीर शेख, शहर उपाध्यक्ष निलेश निकम आणि सागर गाडे. शहर संघटक -अशपाक शाह, सुनील बागुल, खुशाल थोरात, जॉय साळवी, सौरभ डोळस. आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी हा राजीनामा अत्यंत आवश्यक होता. हा विजय देशातील तमाम संविधान प्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष विलास आहिरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनात आणि जल्लोषात मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






