पुणे : महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी आणि आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात, मांजरी येथील वस्तीगृह परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन १३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आले होते. आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. मात्र विद्यार्थांना अजूनही न्याय मिळालेला नाही. दरम्यान, या आंदोलनाला पुण्यातील वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आदिवासी विद्यार्थी आणि समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा संघर्ष सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि आदिवासी समाजाच्या भवितव्याशी निगडित असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने म्हटले आहे.
Also Read : बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
- गडचिरोली येथील आश्रमशाळेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचा १० कोटी रुपयांचा विमा काढण्यात यावा.
- प्रलंबित १२,५०० तसेच इतर आदिवासी नोकरभरती प्रक्रिया तातडीने राबवावी आणि कार्यमुक्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करावी.
- PESA कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
- रक्ताच्या नातेसंबंधावर आधारित जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच बंजारा अभ्यास समितीसंदर्भातील शासन निर्णय रद्द करावा.
- शासन निर्णयातील वयाची अट रद्द करावी.
शासनाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी लवकरात लवकर संवाद साधावा आणि त्यांच्या सर्व मागण्यांवर ठोस, लेखी आणि कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. यावेळी मागण्यांवर योग्य तो निर्णय न झाल्यास संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा संघर्ष अधिक व्यापक करण्याचा इशाराही सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने देण्यात आला आहे.





