चंद्रपूर : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यागमूर्ती माता रमाई बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विश्रामगृह येथे उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून कविताताई मळावी या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाची मूल्ये आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर तेलतुंबडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी कोणती दिशा स्वीकारावी, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई मेश्राम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात आई-वडिलांचे योगदान, त्यांचे कष्ट आणि संस्कारांचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
Also Read : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती
तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान रत्नाकरजी रामटेके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक कसे ठरले आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून आपले भविष्य कसे घडवावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाजी नगराळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी ऊर्जा निर्माण झाली. यानंतर उपस्थित मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





