अकोला : पर्यावरण संवर्धनासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या अकोला महोत्सवाला शुक्रवारी उत्साहात सुरुवात झाली. या महोत्सवांतर्गत तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ उभारण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास अरुधती शिरसाट, डॉ. पल्लवी दिवेकर, वंचित बहुजन आघाडीचे मनपा गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. रश्मी देव यांनी केले, तर प्रास्ताविक नगरसेवक निलेश देव यांनी केले.
Also Read : ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप; नियम ७ आणि शून्य लोकसंख्येवरील आरक्षण रद्द करण्याची मागणी
महिला सक्षमीकरणावर भाष्य करताना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर विशेष भर दिला. महिलांच्या कौशल्याला योग्य बाजारपेठ मिळाल्यास त्या केवळ वस्तू तयार करणाऱ्या न राहता स्वतःच्या पायावर उभ्या राहून रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजिका बनू शकतात, असे त्यांनी सांगितले.
महिलांना दया नको, संधी हवी. संधी मिळाली की महिला स्वतःचा मार्ग स्वतः निर्माण करू शकतात, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. महिलांच्या कष्टांना बाजारपेठ आणि त्यांच्या स्वप्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकाच छताखाली महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ
‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’मध्ये महिलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकला वस्तू, गृहउद्योगातील उत्पादने, घरगुती साहित्य, वस्त्रे, खाद्यपदार्थ तसेच विविध स्वनिर्मित वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महिलांच्या कौशल्याला ग्राहक, उत्पादनांना बाजारपेठ आणि त्यांच्या कष्टांना योग्य मोबदला मिळावा, या उद्देशाने ‘महिलांना हक्काचे व्यासपीठ’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र न राहता महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारी चळवळ ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Also Read : वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक
२० हजार विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा महासंकल्प
अकोला महोत्सवाची सुरुवात यंदा भव्य पर्यावरणपूरक उपक्रमाने झाली. ४, ५ आणि ६ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसीय महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी शहरातील चार ठिकाणी एकाच वेळी तब्बल २० हजार विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या उपक्रमामुळे अकोल्यातील सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
६ सप्टेंबरपर्यंत महाबाजार सुरू
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या अकोला महोत्सवात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान तापडिया नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’ सुरू राहणार आहे. अकोल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महाबाजाराला भेट देऊन महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, त्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन द्यावे आणि महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या या उपक्रमाला पाठबळ द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





