अहिल्यानगर: नीट (NEET-UG) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील लागोपाठ समोर आलेल्या घोटाळ्यांमुळे आणि पेपरफुटीमुळे परीक्षार्थी व पालकांमध्ये सध्या प्रचंड संतापाचे वातावरण आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आणि विद्यार्थ्यांवर निर्माण झालेल्या मानसिक ताणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली, वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शहरात दिल्ली गेट येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. कष्टकऱ्यांच्या मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या गैरकारभाराचा निषेध करत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनाचे नेतृत्व करताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजित कुऱ्हाडे म्हणाले की, कष्टकरी, कामगार आणि गरीब पालकांनी रक्ताचे पाणी करून, कर्ज काढून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला आहे. मात्र, सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि परीक्षांमधील सततच्या घोटाळ्यांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात असून ६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे स्वप्न या टीईटी पेपरफुटीमुळे धुळीस मिळाले आहे. या संपूर्ण गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी संघटनेचे जिल्हा प्रवक्ता विश्वजीत मोरे यांनी परीक्षा पद्धतीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. हा लढा केवळ परीक्षेपुरता मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांचा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय संविधानातील कलम १९ (अभिव्यक्ती आणि मूलभूत स्वातंत्र्य) नुसार विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. जोपर्यंत घोटाळेबाजांवर कठोर कारवाई होत नाही आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी संघटनेचा हा लढा कायम सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व मंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, टीईटी आणि नीट परीक्षा घोटाळ्यांची पारदर्शक व कायदेशीर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजित कुऱ्हाडे, उपाध्यक्ष रियाज शेख, उपाध्यक्ष गोविंद राजगुरू, महासचिव विवेक कसबे, उपसचिव पंकज गायकवाड, कोषाध्यक्ष सम्यक डंबाळे, संपर्क प्रमुख दिनेश भालेराव, जिल्हा प्रवक्ता विश्वजीत मोरे, कायदे सल्लागार शुभम पानसरे, जिल्हा संघटक प्रतीक ठोकळ, संकेत शिंदे, अजिंक्य मार्तंड आणि विकास भाबड यांच्यासह संघटनेचे अनेक जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व आंदोलकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन “No More Excuses, No More Failures” अशा घोषणा देत दिल्ली गेट परिसर पूर्णपणे दणाणून सोडला होता.



