लातूर : वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुक्याच्यावतीने रेणापूर तहसील कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा डेटा, सामाजिक न्याय विभागाचा निधी आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत –
१) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक ७६ लाख मतदान आले कोठून याचा निवडणूक आयोगाने डेटा द्यावा.
२) सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळिवल्याच्या संदर्भात अनुसूचित जाती जमातींचा निधी इतरत्र वळवता येऊ नये यासाठी कायदा करावा.
३) अनुसूचित जाती जमातीच्या निधी संदर्भात महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी.
४) अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी भाषण करताना व बोलताना मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरले आहे, जेणेकरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे, व तसेच महाराष्ट्राचे वातावरण खराब होऊन, धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करून कडक कारवाई करण्यात यावी.
५) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे केवायसी किंवा आधार लिंकने पैसे जाण्यासाठी टेक्निकल अडचण येत आहे, अशा रेणापूर तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांची यादी करून ऑफलाईन पद्धतीने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत. जेणेकरून त्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येणार नाही.
६) संजय गांधी निराधार योजनेच्या याद्या तात्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
७) गरजू वयोवृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार योजने साठी वार्षिक उत्पन्नाची अट २१ हजार रुपये करण्यात यावी.
८) महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकातील आदेशाप्रमाणे घरकुल योजनेतील घरासाठीच्या बांधकामास पाच ब्रॉस वाळू देण्यात यावी किंवा पाच ब्रॉस वाळू ऐवजीमार्केट रेटप्रमाणे पाच ब्रॉस वाळूचे पैसे देण्यात यावेत.
९) शेतकऱ्यांच्या कर्ज माफी प्रमाणेच विविध लहान व्यावसायिक व मजुरांचे विविध महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे.
१०) विविध महामंडळातील कर्ज प्रकरणाच्या मायक्रो फाईल्स तात्काळ मंजूर करण्यात याव्यात.
११) नरेगाची कामे मजुराकडूनच करून घेण्यात यावीत व त्यांना दर दिवसाला पाचशे रुपये मजुरी करण्यात यावी.
१२) रेणापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास मुख्यालयी रहाणे बंधनकारक करावे.
१३) पानगाव-रेणापूर रस्त्याच्या खराब स्थितीमुळे गंभीर रुग्णांना वेळेत लातूर येथे नेण्यास विलंब होत आहे, ज्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. गंभीर रुग्णांना वेळेत लातूर येथे पोहोचवण्यासाठी पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास २४ तास १०८ ॲम्ब्युलन्स व्हॅन उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही रुग्णास आपला जीव गमवावा लागणार नाही.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी, रेणापूर तालुका अध्यक्ष आर.के. आचार्य, माजी तालुका अध्यक्ष खय्युम शेख, तालुका महासचिव विशाल मस्के, तालुका संघटक कृष्णा वाघमारे, रेणापूर शहर अध्यक्ष विपुल तपघाले, अतुल कांबळे, प्रकाश कांबळे, रामराव फुंदे यांच्यासह तालुका कार्यकारिणीतील विविध आजी-माजी पदाधिकारी आणि नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.