मुंबई : आरक्षण ही कोणतीही खैरात नाही. मनुवाद, ब्राह्मणवाद आणि जातीच्या शोषणाविरोधात लढण्यासाठी आरक्षण आणि सामाजिक न्याय ही संविधानाची आवश्यक हत्यारे आहेत. जोपर्यंत मनूवादी आणि ब्राह्मणवादी जातिभेद करत राहतील, बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करत राहतील आणि आपल्या तथाकथित “सवर्ण” ओळखीच्या गर्वात घोषणा देत राहतील, तोपर्यंत आरक्षण राहील असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी मी देशात दलित आणि आदिवासींवर अत्याचार होत असल्याचे वाचत नाही, आणि सोशल मीडियावर मनूवादी व ब्राह्मणवादी बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द वापरताना आणि शिवीगाळ करताना दिसत नाहीत.
– बालाघाटमध्ये आदिवासींप्रती सरकारी निष्काळजीपणामुळे ३० बैगा आदिवासी मुलांचा मृत्यू, ३ महिन्यांनंतर जागे झाले मुख्यमंत्री.
– महाराष्ट्रातील जालन्यात बजरंग दलाकडून दलित व्यक्तीवर हल्ला, बळजबरीने गायीचे शेण खाण्यास भाग पाडले.
– तमिळनाडूतील मदुराई येथे जातीवर आधारित अपमान आणि शिक्षकांच्या दुर्व्यवहाराला कंटाळून दोन गुणवंत दलित विद्यार्थिनींची आत्महत्या.
– PhD कोर्सवर्क पूर्ण करून वर्षापेक्षा जास्त काळ उलटला, तरीही केरळमधील दलित महिला PhD विद्यार्थिनीला संशोधन सुरू करू दिले नाही; फेलोशिपच्या बदल्यात शौचालय साफ करणे आणि जातिवाचक टिप्पण्या सहन कराव्या लागल्या.
– पुण्याच्या सरकारी वसतिगृहात सुट्टीवरून परतणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींची गरोदरपणाची (प्रेग्नन्सी) तपासणी!
– उत्तर प्रदेशातील बदाऊंमध्ये आंबेडकर पुतळा बसवण्यास उच्चजातीय ग्रामस्थांचा विरोध, पोलिसांवर तुफान दगडफेक.
– मंदिराच्या दुरुस्तीसाठी स्वतः पैसे दिले, तरीही पासी समाजाच्या भाजप आमदार जय देवी कौशल यांना काकोरी शीतला मंदिरात प्रवेश करू दिला नाही; भाजप गप्प.
– हलद्वानीमध्ये काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धीकरण’, मौनामुळे खरगे दुखावले; राहुल यांनी २० दिवसांनंतर सोडले मौन.
– ओडिशातील रायगडमध्ये वेदांत खाणकामाचा विरोध करणाऱ्या दलित-आदिवासींना जामिनाऐवजी पोलीस ठाणे साफ करण्याचा जातिभेदयुक्त आदेश.
ह्या घटना गेल्या काही दिवसांतीलच काही रिपोर्ट झालेल्या घटना आहेत. परंतु दलित आणि आदिवासींविरुद्ध जातिभेद आणि हिंसेच्या घटना संपूर्ण भारतात दररोज घडतात.
…आणि यांना देशातून आरक्षण हटवायचे आहे ! याच कारणासाठी मनूवाद, ब्राह्मणवाद आणि जातीच्या शोषणाविरोधात लढण्यासाठी आरक्षण आणि सामाजिक न्याय ही संविधानाची आवश्यक हत्यारे असल्याचेही ॲड. आंबेडकरांनी म्हटले आहे.
आरक्षणावर हल्ला म्हणजे सामाजिक न्यायावर हल्ला आहे.
आरक्षणावर हल्ला म्हणजे बाबासाहेबांवर हल्ला आहे.
आरक्षणावर हल्ला म्हणजे संविधानावरील हल्ला आहे.
आरक्षणावर हल्ला म्हणजे भारतावर हल्ला आहे.
आणि आम्ही या हल्ल्याविरोधात लढत राहू. असा इशारा ॲड. आंबेडकरांनी दिला.






