मुंबई : घाटकोपर येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेची वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चिराग नगर येथे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली होती.
या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याने त्यांनी दुःख व्यक्त करत ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगितले.
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे झालेल्या गंभीर दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने जबाबदारी निश्चित करून ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्नेहल सोहनी यांनी केली.
यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुःखाच्या या कठीण प्रसंगी वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शासन व प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव प्रयत्नशील राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवा आघाडीचे सुनील गायकवाड, प्रभाग समन्वयक साक्षी वाघमारे, दिलीप वाघ, कपिल कांबळे आदी उपस्थित होते.





