तपास अहवालातील त्रुटींवर लेखी हरकती!
मुंबई : परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी बौद्ध समाजातील भगिनी वच्छलाबाई भगवान मानवते यांना दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक करून पोलिस ठाण्यात अमानवीय छळ (Custodial Torture) करण्यात आल्याच्या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगात दाखल तक्रारीवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने या सुनावणीत तक्रारदाराच्या वतीने अॅड. हितेंद्र गांधी, ॲड. संदेश मोरे, ॲड. डॉ. बाबासाहेब जाधव, ॲड. अजय गायकवाड, ॲड. आकाश साळवे आणि योगेश परमार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणात सुरुवातीला संबंधित पोलिस विभागाने आयोगाकडे अहवाल सादर केला होता. मात्र, तक्रारदाराच्या वतीने त्या अहवालाला ठाम विरोध करण्यात आला. प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकारी हेच या प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांनी सादर केलेला अहवाल निष्पक्ष, विश्वासार्ह व ग्राह्य धरता येणार नाही, अशी भूमिका आयोगासमोर मांडण्यात आली. त्यामुळे राज्य मानवी हक्क आयोगाच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन विभागामार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष पुनर्तपास करून नवीन अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली.
या मागणीची दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने ३० मार्च २०२६ रोजी एक सदस्यीय समिती नियुक्त करून प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. समितीने चौकशी करून आयोगाकडे अहवाल सादर केला. मात्र, या अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे तसेच तपासात गंभीर त्रुटी आणि विसंगती असल्याचे तक्रारदाराच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले.
आजच्या सुनावणीदरम्यान समितीने सादर केलेल्या तपास अहवालाविरोधात सविस्तर लेखी हरकत आयोगाकडे दाखल करण्यात आली. या लेखी निवेदनात तपासातील त्रुटी, अपूर्णता, दुर्लक्षित पुरावे आणि प्रक्रियात्मक चुका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर निकषांनुसार पुनर्विचार करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील आजची सुनावणी महत्त्वपूर्ण ठरली असून, आयोगाकडून या लेखी हरकतींचा विचार करून न्याय्य निर्णय दिला जाईल, अशी अपेक्षा तक्रारदाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
याच प्रकरणातील पोलीस कोठडीत मृत्यू पावलेले शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठीची लढाई राज्य मानवी हक्क आयोगात सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही लढाई लढली जात आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या लीगल सेलचे ॲड. संदेश मोरे, ॲड. हितेंद्र गांधी, ॲड. डॉ. बाबासाहेब जाधव, ॲड. अजय गायकवाड, ॲड. आकाश साळवे आणि योगेश परमार उपस्थित होते.






