औरंगाबाद : शहरातील सिद्धार्थ नगर, शताब्दी नगर, शहा बाजार तसेच इतर परिसरांतील दूषित पाणीपुरवठा, दीर्घकालीन पाणीटंचाई आणि मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद महानगरपालिकेसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देत तातडीने प्रश्न न सोडवल्यास पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुमारे २७४० कोटी रुपये खर्च होऊनही शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. सिद्धार्थ नगर, शताब्दी नगर आणि शहा बाजार परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाणी थेट पिण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याचे सांगण्यात आले.
तसेच प्रभाग क्रमांक १ मधील राधास्वामी कॉलनी, चेतना नगर, रमाबाई नगर, अंबर हिलसह आठ भागांमध्ये गेल्या ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनच टाकण्यात आलेली नसल्याची बाबही आंदोलनात मांडण्यात आली. हर्सूल धरणातून १७ वॉर्डांना पाणीपुरवठा होत असताना या भागांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.
Also Read : कॉमनवेल्थ गेम्स २०२६: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची दमदार कामगिरी, भारताला मिळवून दिले रौप्यपदक!
फुलेनगर येथील रमाबाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून घरे मिळालेली नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. तसेच अंबर हिल परिसरात स्मशानभूमी, रस्ते आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगण्यात आले. हर्सूल गट क्रमांक २१६ व १७ येथील सरकारी गायरान जमिनीवर गेल्या १५ वर्षांपासून पंचनामे झालेल्या लाभार्थ्यांना रमाबाई आवास योजनेअंतर्गत घरे देण्याची मागणीही करण्यात आली.
महानगरपालिकेने तातडीने दूषित पाणीपुरवठा थांबवून स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये नवीन पाईपलाईन टाकावी आणि प्रलंबित घरकुल व नागरी सुविधांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, महासचिव भगवान खिल्लारे, अशोक गवळी, आनंद शेजूळ, दामोदर दाभाडे, राहुल वेलदोडे, प्रकाश दाभाडे, राहुल गायकवाड, गोकुळ भुजबळ, प्रमोद नवगिरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.





