डॉ. निरज वाघमारे यांच्या हस्ते नुकसानभरपाई प्रदान; सफाई कामगारांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात
यवतमाळ : यवतमाळ नगर परिषदेच्या सफाई विभागात वाहनचालक म्हणून कार्यरत असलेले किशोर उत्तमराव शेंडे (वय ४६) यांचा २५ मार्च २०२६ रोजी कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅक्टर-ट्रॉलीची दुरुस्ती सुरू असताना जॅक अचानक निसटल्याने कचऱ्याने भरलेली ट्रॉली त्यांच्या अंगावर उलटली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर शेंडे कुटुंबाने आपल्या उपजीविकेचा मुख्य आधार गमावला. कुटुंबाला न्याय व आर्थिक नुकसानभरपाई मिळावी यासाठी २३ एप्रिल २०२६ रोजी संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. मात्र अनेक महिने उलटूनही शासन किंवा संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही आर्थिक मदत अथवा नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेंडे कुटुंब गंभीर आर्थिक व मानसिक संकटात सापडले.
या पार्श्वभूमीवर डॉ. निरज वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गटनेता तथा नगरसेवक, नगर परिषद यवतमाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवंगत किशोर शेंडे यांच्या कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत प्रदान केली. ही मदत दुःखाची भरपाई नसून, संकटाच्या काळात कुटुंबाला आधार देण्याचा आणि त्यांच्या पाठीशी समाज उभा असल्याचा विश्वास देण्याचा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Also Read : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे पेढे वाटून जोरदार जल्लोष!
यावेळी डॉ. निरज वाघमारे यांनी सांगितले की, सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेसाठी अत्यंत कठीण आणि जोखमीचे काम करतात. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे, सामाजिक सुरक्षेकडे आणि अपघातानंतरच्या नुकसानभरपाईकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने तातडीने ठोस धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
सफाई कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य, विमा संरक्षण, नियमित रोजगार, कायदेशीर हक्क आणि अपघात झाल्यास तात्काळ आर्थिक नुकसानभरपाई मिळणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे. कोणत्याही कामगाराच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये, यासाठी आपण पुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार डॉ. निरज वाघमारे यांनी व्यक्त केला.




