३५०० कार्यकर्तेपोलीसंचा ताब्यात ; तरीही ‘ महाराष्ट्र बंद ‘ यशस्वी
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदवर ट्विट द्वारे प्रतिक्रिया देत म्हटले की, विद्यार्थ्यांच्या समर्थनात आणि हुकूमशाहीच्या विरोधात महाराष्ट्र एकवटला आहे. तसेच हा बंद यशस्वी आणि शांततेत चालू आहे.
सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या, आपल्या भविष्यासाठी चिंतीत असलेल्या विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीला जबाबदार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे शांततापूर्ण मार्च काढला. मात्र, हुकूमशाही भाजप सरकारने अमानुष आणि क्रूर पद्धतीने विद्यार्थ्यांवर मारहाण केली.
विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील जनता हुकूमशाहीच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनात एकत्र आली असल्याचेही त्यांनी म्हटले.
वंचित बहुजन आघाडीसह महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, व्यापारी, समविचारी पक्ष, संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने कडकडीत बंद पाळला असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र बंदच्या दरम्यान ३५०० पेक्षा अधिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. तरी सुद्धा आम्ही शांततपूर्वक महाराष्ट्र बंद करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने कितीही प्रयत्न केला तरी वंचित बहुजन आघाडी दडपशाहीला हुकूमशाहीला घाबरणार नाही, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.
हा बंद शांततापूर्ण सुरू असून यशस्वी ठरत आहे. भाजप-आरएसएसच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सर्व एकत्र लढून शिक्षण व्यवस्थेतील गोंधळावर न्याय मिळवून देऊ. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




