मुंबई : दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठी हल्ल्या विरोधात दि. २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंद मध्ये जनतेने व सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व डाव्या पक्षांनी केले आहे.
दि. २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. डाव्या पक्षांनाही या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाकप, माकप, शेकाप, भाकप (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची तातडीची ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली व २३ जुलै रोजीचा बंद वंचित बहुजन आघाडी, डावे पक्ष व सर्व लोकशाहीवादी पक्ष, संघटनांनी एकत्रितपणे यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पंचवीस दिवसांपासून दिल्ली येथील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा; तसेच शिक्षणातील अनागोंदी व भ्रष्टाचार थांबविण्यात यावा या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके व विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम वांगचुक यांना हुकूमशाही पद्धतीने पहाटेच्या वेळी अटक करून आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला केला.
दि. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशभरातून लाखोच्या संख्येने विद्यार्थी-युवक व पालक दिल्लीत पोहोचले होते. यावेळी केंद्र सरकारच्या आदेशाने दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांवर निर्दयपणे बेछूट लाठी हल्ला केला आहे. त्यात शेकडो तरुण जखमी झाले आहेत. अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतरही आंदोलकांना मारहाण करण्यात आली आहे.
याचा निषेध म्हणून २३ जुलै रोजी ही बंदची हाक दिली असून राज्यातील इंडिया आघाडी मधील सर्व लोकशाहीवादी पक्ष व जनसंघटनांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माले), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांच्या वतीने भाई जयंत पाटील, कॉ. अॅड. सुभाष लांडे, कॉ. डॉ. अजित नवले, कॉ. उदय भट, कॉ. किशोर ढमाले, किशोर कर्डक यांनी केले आहे.





