अकोला : प्रभाग क्रमांक ३ तसेच २०१६ मध्ये महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या हद्दवाढ भागातील नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी सोमवारी (दि. २०) सकाळी १० वाजल्यापासून अकोला महानगरपालिका मुख्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले होते.
दरम्यान, अन्नत्याग आंदोलन अखेर रात्री उशिरा यशस्वीरीत्या स्थगित करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची व कालबद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
सकाळी सुरू झालेल्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई, शेख शमशु शेख साबीर, बबलू पातोंडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, मनोहर बनसोड, गजानन गवई, शंकरराव इंगळे, राजेश मोरे, धीरज खंडारे, साजन अपगड, सुगंत तायडे, शोभाताई शेळके, ज्ञानेश्वर सुलताने, मनपा विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसैन, विजय इंगळे (गटनेता शिवसेना) यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
संध्याकाळच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त सुबोध अलोणे, अतिरिक्त आयुक्त गणेश शहाणे, झोन अधिकारी राजेश सराफ, दिलीप जाधव तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या दालनात संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत आंदोलनातील प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा झाली आणि संबंधित विषयांवर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही व आवश्यक निर्णय घेण्याची हमी देण्यात आली. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर नगरसेवक निलेश देव यांनी नागरिकांच्या हिताचा विचार करून आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.
यापूर्वी दि. १५ जुलै रोजी अतिरिक्त आयुक्त सुबोध अलोणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन व नगरसेवक निलेश देव यांच्यात सकारात्मक बैठक झाली होती. मात्र त्यानंतर कोणताही लेखी आदेश अथवा कालबद्ध निर्णय न झाल्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या उद्देशाने बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.
आंदोलनातील प्रमुख मागण्या –
– मच्छिंद्र नगर ते ढोणे महाविद्यालय परिसरातील जलकुंभ प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना
– शहरातील रेल्वे मोऱ्यांची तातडीने स्वच्छता.
– जठार पेठ, ज्योती नगर व मच्छिंद्र नगर परिसरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था.
– न्यू तापडिया नगरसह हद्दवाढ भागात एलईडी स्ट्रीटलाईट बसविणे.
पंचशील नगर, डुंबे वाडी, चैतन्य नगर, दम्माणी परिसर, खरप ले-आऊट, पवन नगरी, निर्मल्य नगर आदी भागातील प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करणे.
– मुख्य नाल्यांवरील अतिक्रमण हटवून नाला सुधारणा करणे.
– पंचशील नगर पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करणे.
– समतोल पाणीपुरवठ्यासाठी कंट्रोल व्हॉल्व्ह बसविणे.
– दलित वस्ती सुधारणा निधीचे न्याय्य व समान वाटप.
– २०१६ मध्ये महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या हद्दवाढ भागासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करून मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे.
यावेळी नगरसेवक निलेश देव यांनी सांगितले की, “हा संघर्ष प्रशासनाविरोधात नसून नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. आयुक्तांनी सर्व विषयांवर सकारात्मक कार्यवाहीची हमी दिली असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांच्या हितासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील.” या आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






