औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील मातंग वस्तीवर १४ जुलै रोजी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल पुरी गावातील मातंग समाजातील महिला व पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीचे आभार मानले.
याप्रसंगी समाजबांधवांनी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातही आपण कायम वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
१४ जुलै रोजी पुरी येथील मातंग वस्तीवर कथित वाळू तस्करांनी हल्ला केल्यानंतर रुपचंद गाडेकर यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर १७ जुलै रोजी त्यांनी पुरी गावात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झाली आहे का, तसेच तपासाची सद्यस्थिती काय आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ २० जुलै रोजी गंगापूरचे पोलिस उपअधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती समाजबांधवांना देण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कोमलताई हिवाळे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, तालुका उपाध्यक्ष भास्कर खंडागळे, सरला जाधव, ज्योती जाधव, सुमित जाधव, शुभम इगे तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






