15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनंतर बिहारमधून आणखी एक क्रिकेटचा हिरा; अंडर-19 वन-डे स्पर्धेत अक्षरा गुप्ताची विक्रमी कामगिरी
भागलपूर : बिहार क्रिकेटमधून आणखी एक उदयोन्मुख प्रतिभा समोर आली आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 महिला वन-डे ट्रॉफीमध्ये 19 वर्षीय अक्षरा गुप्ता हिने अवघ्या 126 चेंडूंमध्ये 306 धावांची तुफानी खेळी साकारत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
18 जून रोजी भागलपूर येथील सँडिस कम्पाउंड स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम-ए कडून सलामीला उतरलेल्या अक्षराने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. तिने 16 चेंडूंमध्ये अर्धशतक, तर 34 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यानंतरही तिची धडाकेबाज फलंदाजी कायम राहिली आणि तिने 126 चेंडूंमध्ये 306 धावांची ऐतिहासिक खेळी उभारली. तिच्या डावात 55 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.
Also Read : वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटके-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक
अक्षराच्या या तुफानी खेळीला सलोनी कुमारीने 57 धावांची साथ दिली. या जोरावर टीम-एने निर्धारित षटकांत 450 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात टीम-सीचा संपूर्ण संघ 21.3 षटकांत केवळ 121 धावांवर गारद झाला. परिणामी, टीम-एने 329 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.
सामन्यानंतर अक्षरा गुप्ताने सांगितले की, क्रिकेट खेळण्याची प्रेरणा तिला तिच्या भावाकडून मिळाली. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तिने क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला असून, ती गेल्या दोन वर्षांपासून बिहारच्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
Also Read : नांदेड : लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा
अक्षरा गुप्ताच्या या विक्रमी खेळीनंतर क्रिकेट वर्तुळात तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सातत्यपूर्ण कामगिरी कायम राहिल्यास भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघात तिची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





