नंदुरबार : वंचित बहुजन आघाडी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनसंवाद मेळावा मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील रखडलेला विकास, स्थानिक राजकारणातील घराणेशाही, आदिवासी व वंचित समाजाच्या समस्या यांसह विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांनी जाब विचारला.
Also Read : विधान परिषद निवडणुकीत नगरसेवकांच्या संशयास्पद अनुपस्थितीची चौकशी करा; निवडणूक निरीक्षकांकडे प्रशांत इंगोले यांचे निवेदन
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलनांच्या वेळी प्रशासनाने दाखविलेल्या वेगवेगळ्या भूमिकांवरही त्यांनी टीका केली. पुण्यात झालेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी विशेष वागणूक दिली, तर मुंबईत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. या कारवाईत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे यांचा हात मोडल्याचे देखील त्यांनी सांगितले. पुण्यात नीट पेपर लिक प्रकरणी आंदोलन झाले तेव्हा पोलिसांनी विद्यार्थ्यांना चहा पाजला, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली. सरकार कोणाला घाबरते आणि कोणाला दडपण्याचा प्रयत्न करते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडी कोणत्याही दबावाला न घाबरता सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका करत असल्याचे सांगत त्यांनी नव्याने उदयास येणाऱ्या राजकीय पर्यायांच्या विचारधारेबाबतही मत व्यक्त केले. कॉकरोज जनता पार्टीला पाठिंबा किंवा विरोध करण्याआधी त्यांची विचारधारा काय आहे? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जो आंबेडकरी विचारांसोबत नाही, आम्ही त्याच्या सोबत नाही से देखील ते म्हणाले.
तसेच आंबेडकरी विचारांच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करताना त्यांनी निळा झेंडा हातात घेतल्याने कोणी आंबेडकरवादी होत नाही, तर त्यासाठी कृती आणि भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावरही त्यांनी भाष्य केले. ‘निर्भय बनो’च्या नावाखाली विश्वंभर चौधरी, निखिल वागळे, असीम सरोदे आदि लोकांनी 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पाकीट घेऊन वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम ठरवण्याचा प्रचार केला.
Also Read : बुद्धभूमी फाउंडेशनवरील कारवाईच्या निषेधार्थ पैठणमध्ये तीव्र निदर्शने
यावेळी ते म्हणाले की, ह्या लोकांना माझा एक प्रश्न आहे, तुम्ही मविआचे प्रचारक आहात, तर आज कॉकरोज जनता पार्टीला तुमचे समर्थन का? महाराष्ट्रात तिसरा पर्याय गरजेचा आहे असं तुम्हाला वाटतं असेल तर जेव्हा वंचित बहुजन आघाडी उभा होता तेव्हा त्याला बदनाम का केलं? भविष्यात तेच तुम्ही सीजेपी सोबत करणार नाहीत, याची काय गॅरंटी आहे?
आपल्या समाजातील काही जण अजूनही भाबडे म्हणून जगताय. कोणीही जयभीम म्हटले, बाबासाहेबांचा फोटो दाखवला, निळा शर्ट घातला, संविधान दाखवले तर आमचे काही लोकं खुशीने उड्या मारतात. पण, एक लक्षात घ्या निळा झेंडा कोणी हातात घेतल्याने तो आंबेडकरवादी होत नाही. इतिहासात अनेकांनी तोच निळा झेंडा काढून त्याच दांड्याने आपल्या समूहाला मारले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्वांचा त्यात सहभाग आहे. त्यामुळे कोणालाही डोक्यावर घेण्याआधी त्याला त्याची भूमिका विचारा असे सुजात आंबेडकर म्हणाले.
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एकदा संधी देण्याचे आवाहन करत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचे आवाहन नागरिकांना केले. आदिवासी, वंचित आणि पीडित घटकांचा विकास कसा करायचा हे दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जनसंवाद मेळाव्याला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.






