– विशाल श्रीधर कांबळे
म्हणजेच याचा अर्थ असा होतो की मदत केली तरी चालेल आणि नाही केली तरी चालेल. विषय मनावर घेण्याची गरज नाही. मानसशास्त्र हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्याचा मी अभ्यासही केला आहे. मंत्री असोत किंवा मोठे अधिकारी, त्यांच्या काही विशिष्ट खुणा, संकेत किंवा हावभाव असतात. त्या गोष्टी त्यांच्या अगदी जवळच्या कर्मचाऱ्यांनाच माहीत असतात. एखादे काम करायचे असेल तर त्याची खूण वेगळी असते आणि एखादे काम करायचे नसेल तर त्याची खूण वेगळी असते. तोंडाने ते काम करण्यास सांगतील, पण कागदावरची खूण वेगळाच संदेश देत असते.
एखाद्या मंत्र्यांना भेटण्याचा हा माझ्या आयुष्यातील पहिलाच अनुभव होता. पहिल्याच भेटीत मी त्यांचे निरीक्षण केले. निरीक्षण करणे ही माझी सवयच आहे. माननीय वनमंत्री गणेश नाईक यांनी आमच्या कागदावर सही करण्याऐवजी एक विशिष्ट खूण केली. त्याचा अर्थ फक्त त्यांच्या पीएला माहीत असेल. त्यांची सही त्यांच्या नावाप्रमाणे असायला हवी होती, परंतु त्यांनी सही न करता ती खूण केली आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आम्हाला पाठवले.
विषय होता – बोरीवली पश्चिम येथील नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारावर “२२०० वर्षांपूर्वीचा कान्हेरी बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक वारसा” असे नाव देण्यात यावे.
साधारण वर्षभरापूर्वी नॅशनल पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठी कमान उभारण्यात आली आणि त्यावर “संजय गांधी राष्ट्रीय उद्यान” असे लिहिण्यात आले. मात्र, त्याआधी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या झोन क्रमांक ४ चे सदस्य व पदाधिकारी यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी नॅशनल पार्कच्या वनसंचालकांना पत्र देऊन त्या फलकावर “कान्हेरी बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक वारसा समूह” हे शब्द नमूद करण्याची मागणी केली होती.
त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले होते की, “हा प्रस्ताव शासनाकडून, म्हणजे वनमंत्र्यांकडून आला तर आम्ही हे काम निश्चितपणे करू.”
त्यांच्या सूचनेनुसार आम्ही २६ मे २०२६ रोजी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. त्यांना संपूर्ण विषय समजावून सांगितल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर एवढेच सांगितले, “जमलं तर यांची मदत करा.”
असे म्हटल्यानंतर कनिष्ठ अधिकारी आमची मदत का करतील? ते नक्कीच करणार नाहीत. आमच्या कागदावर त्यांनी सहीही केली नाही. जेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारले की, “यावर मंत्र्यांची सही आहे का?”, तेव्हा संबंधित मॅडम म्हणाल्या, “हे आम्हाला विचारू नका, तुम्ही त्यांनाच विचारा.”
कारण विषय होता बौद्ध धम्माच्या प्रसाराचा. खुर्चीवर बसलेले हे महानायक बौद्ध धम्माचा प्रसार का होऊ देतील? त्यांना तर बौद्ध धम्म कमकुवत करायचा आहे, हा त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसते. तरीसुद्धा आम्ही मुख्य प्रवेशद्वारावर “कान्हेरी बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक वारसा समूह” हे नाव देण्याचा विषय सोडलेला नाही आणि सोडणारही नाही.
ज्या मॅडमसमोर आम्ही चर्चा करत होतो, त्यांनी कायद्यातील विविध पळवाटा सांगण्यास सुरुवात केली. त्यांनी आम्हाला असेही सांगितले की, “तुम्ही ज्यांना भेटायला आलात ते योग्य शासन नाही. तुम्हाला दुसऱ्या शासनाकडे जायला हवे होते.” मात्र ते दुसरे शासन कोणते, हे त्या सांगण्यास तयार नव्हत्या. अशा प्रकारे त्यांनी आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
मुळात प्रश्न एवढाच होता की, “संजय गांधी राष्ट्रीय उद्यान” हे नाव नंतरचे आहे; आधीचा इतिहास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. हा छोटासा बदल करणे शक्य होते, पण तो करण्याची त्यांची इच्छा नव्हती. कान्हेरी बौद्ध लेण्यांना भेट देण्यासाठी बसभाडे आणि प्रवेश शुल्क मिळून एका सामान्य व्यक्तीला सुमारे ३०० रुपये खर्च येतो. चार जणांच्या कुटुंबासाठी हा खर्च १२०० रुपयांपर्यंत पोहोचतो, जो सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नाही.
हा विषय आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडला असता त्यांनी खालील मागण्या मान्य केल्या:
१) भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या सदस्यांना नॅशनल पार्क प्रवेश निशुल्क देण्यात येईल.
२) कान्हेरी लेण्यांच्या पायथ्याशी एक कमान उभारून त्यावर “बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक वारसा” असे लिहिण्यात येईल.
३) बसचे भाडे कमी करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र मुख्य प्रवेशद्वारावर “कान्हेरी बौद्ध लेण्यांचा ऐतिहासिक वारसा समूह” हे नाव लिहिण्यास त्यांनी विरोध दर्शवला.
उत्तर मुंबईतील अनेक बांधवांना आठवत असेल की काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने कान्हेरी लेण्यांमध्ये मोठमोठी शिवलिंगे आणि शंकराच्या मूर्ती असल्याचा दावा केला होता. बौद्ध इतिहासावर अतिक्रमण करून तो बदलण्याचे प्रयत्न पूर्वीपासून सुरू आहेत.
साधारण २०२२ मध्ये एका नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, “आम्ही कान्हेरी लेण्यांवरही सुधारणा करणार आहोत.” त्या सुधारणा नेमक्या काय आहेत, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.
माझ्या समाजबांधवांनी यापूर्वी मोठी जागरूकता दाखवत असे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत. पण इतिहास बदलण्याचे प्रयत्न पुन्हा पुन्हा सुरू राहतात. त्यामुळे समाजाने सतर्क आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.
आंबेडकरी जनतेला एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या परिसरात कोणताही बौद्ध वारसा असेल तर तो जतन करण्यासाठी एक पाऊल पुढे या. कारण येत्या शंभर वर्षांत जर हा इतिहास बदलून टाकला गेला, तर बाबासाहेबांचे शब्द खरे ठरतील.
“मी तुम्हाला बौद्ध धम्म देतोय; पण उद्या लोक असे म्हणू नयेत की या महारांनी बौद्ध धम्म बाटवला.”
— परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्य वैचारिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या बौद्ध झालो आहोत, म्हणून जागृत आहोत. तुम्हीही जागे व्हा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेला अधिक मजबूत करा.






