यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. मात्र, राज्यातील विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर शासन कर्जमाफीची फसवी घोषणा करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून काल, ५ जून २०२६ रोजी जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्या नेतृत्वात यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मुख्य मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रभरात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. राज्यातील पहिला शेतकरी बळी याच जिल्ह्यात गेला होता. दुर्दैवाने, आजपर्यंत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन पूर्णपणे कुचकामी ठरले आहे. जिल्ह्यात झालेली प्रचंड अतिवृष्टी आणि सततची नापिकी यामुळे येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यातून वगळून शासनाने येथील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेला स्थानिक प्रस्थापित नेत्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. मुख्यमंत्री जेव्हा विरोधी बाकावर होते, तेव्हा त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले प्रेम आजही कायम असेलच, अशी आशा व्यक्त करत निवेदनात पुढे म्हटले आहे की:
“मायबाप सरकार म्हणून आपण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात. एक विशेष बाब म्हणून कोणत्याही अटी व शर्ती न लावता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि जिल्ह्याला तातडीने पीक विमा लागू करावा.” या मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. डी. के. दामोधर यांच्यासह नितेश कठाळे (जिल्हा उपाध्यक्ष), शुभम राऊत (तालुकाध्यक्ष, नेर), संदीप आढाव (तालुकाध्यक्ष, पुसद), उत्तम मुनेश्वर (तालुकाध्यक्ष, आर्णी) पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यकर्त्यांमध्ये प्रवीण रामटेके, अविनाश गुरुदे, आनंदा खडसे, प्रकाश चव्हाण, सुरज चव्हाण, रवी उमरे, न्योगिता बोरकर, सतीश आढाव आदी उपस्थित होते.






