ठाणे : NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 29 मे 2026 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय धरणे आंदोलन करण्यात आले.
देशातील NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर तसेच पालकांच्या आर्थिक व मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेल्याचा आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे, Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024 ची कठोर अंमलबजावणी करावी, राधाकृष्णन समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करून NEET परीक्षेची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे द्यावी, देशभरातील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करावी तसेच शिक्षणातील वाढते व्यापारीकरण थांबवून खासगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा लागू करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाद्वारे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अनिकेत बंडू मोरे, महासचिव राजू खरात, कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष कमलेश उभाळे, ठाणे जिल्हा सदस्य सुशांत साबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.




