Randhir Singh Passes Away : भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत वेदनादायी बातमी समोर आली आहे. भारताचे माजी ऑलिम्पियन नेमबाज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी (दि. २७) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रणधीर सिंग हे केवळ उत्कृष्ट नेमबाज नव्हते, तर भारतीय क्रीडा व्यवस्थापनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे प्रभावी नेतृत्वही होते. ट्रॅप आणि स्कीट शूटिंगमध्ये त्यांनी भारताचे तब्बल पाच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत देशाचा गौरव वाढवला.
Also Read : 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ॲड. प्रकाश आंबेडकर
1978 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्यांनी इतिहास घडवला होता. एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारे ते भारताचे पहिले नेमबाज ठरले होते. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर 1979 मध्ये त्यांना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Randhir Singh Passes Away)
खेळाडू म्हणून चमकदार कारकीर्द गाजवल्यानंतर त्यांनी प्रशासक म्हणूनही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 2001 ते 2014 या काळात ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) चे सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
याशिवाय, 1991 ते 2015 या कालावधीत त्यांनी ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) चे महासचिव म्हणून काम पाहिले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. दिल्ली येथे 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारताला मिळवून देण्यात रणधीर सिंग यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्या स्पर्धेच्या आयोजन समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले होते. (Randhir Singh Passes Away)
Also Read : बोईसर ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ कारवाईविरोधात बेमुदत धरणे आंदोलन; १५ दिवस उलटूनही प्रशासन सुस्त!
रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारतीय नेमबाजीसह संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि विविध क्रीडा संघटनांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.






