परभणी : राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याची झळ आता थेट सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू लागली आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डिझेल टंचाई तीव्र झाली असून पेट्रोल पंपांवर वाहनांसह कॅन घेऊन नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मानवत तालुक्यातील रूढी पाटी शिवारातील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. संतप्त तरुणांनी एकमेकांवर कॅन फेकत मारहाण केल्याचे प्रकार घडले. या घटनेमुळे पेट्रोल पंप परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत संबंधितांना शांत केले.
Also Read : मोदी अमेरिकेच्या तालावर नाचत आहेत – ॲड. प्रकाश आंबेडकर
या घटनेमुळे काही काळ पेट्रोल पंपावरील वाहतूक आणि डिझेल वितरण विस्कळीत झाले. जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता वाढत असून अनेक ठिकाणी गोंधळाचे प्रकार समोर येत आहेत.
एकीकडे शेतकरी रात्रभर डिझेलसाठी जागून काढत आहेत. चार ते पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतर कुठे दोन हजार रुपयांचे डिझेल कॅनमध्ये मिळत असल्याची परिस्थिती आहे. शेतीच्या कामांसाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मात्र दुसरीकडे वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा आणि ट्रकांना मुबलक प्रमाणात डिझेल मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे. डिझेल टंचाईची झळ वाळू माफियांना मात्र बसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “सरकारला शेतकरी जगवायचा आहे की वाळू माफिया?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Also Read : भारतीय अर्थव्यवस्था (२) : मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, कमकुवत कडी !
दरम्यान, काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगेत उभे राहून कॅनमध्ये डिझेल घेऊन ते अधिक दराने वाहनधारकांना विकण्याचा काळाबाजार सुरू असल्याचेही समोर येत आहे. या सर्व प्रकारावर पुरवठा विभाग आणि प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





