Akola : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या सामूहिक वाचन उपक्रमांतर्गत अकोल्यात रविवारी (26 एप्रिल 2026) सायंकाळी 5.30 वाजता सुंदराबाई खंडेलवाल टॉवर, जुने बसस्थानक, टॉवर चौक येथे सामूहिक वाचन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने करण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या विविध आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुस्तकातील मुद्द्यांचे क्रमशः वाचन करत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिकरीत्या पूर्ण वाचन केले.
या उपक्रमाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे सामाजिक आणि ऐतिहासिक आकलन व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे जिल्हाध्यक्ष इंजि. धीरज इंगळे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, महिला जिल्हा महासचिव संगीता आढाव, युवा जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, महानगर अध्यक्ष निलेश देव, महानगर महासचिव गजानन गवई, जि.प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, प्रभाताई शिरसाट, माजी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशिव, नगरसेवक शेख शमशू यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत महासभा आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही कार्यक्रमात सक्रिय सहभाग होता. राज्यभर सुरू असलेल्या या सामूहिक वाचन अभियानाला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.






