– संजीव चांदोरकर
भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशात तापमान सतत वाढत आहे. आज नाही गेले दोन तीन महिने.
भारतासकट या सर्व गरीब देशांमध्ये हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी लोकांचे प्रमाण खूप मोठे आहे. यातील बहुसंख्य लोक उघड्यावर काम करतात. त्यामुळे त्यांना प्रखर उन्हात काम करावे लागते. आजारी पडू या भीतीने कामावर गेले नाही तर त्यांची त्या दिवसाची चूल पेटत नाही.
आपल्या देशात देखील उष्णतेमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण मृत्यू झाल्यावर तत्कालीन वेगळ्याच कारणाने मृत्यू झाल्याची नोंद केली जाते. त्यामुळे उष्माघाताचे गांभीर्य आकडेवारीत पकडले जात नाही.
एव्हढेच नाही युरोपियन देशांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. ब्रिटन , फ्रांस मध्ये अनेक ठिकाणी तापमान ऐतिहासिक उंचीवर पोचत आहे. शाळांना सुट्या दिल्या गेल्या आहेत. १२ देशांनी नागरिकांना इशारे जारी केलेले आहेत.
धोरण कर्त्याना यावर्षी अल निनोची पंचिंग बॅग मिळाली आहे. सारे बिल अल निनो वर घातले जात आहे. पण वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यातील तापमान, पावसाळयात अतिवृष्टी, हिवाळ्यात शून्याखाली तापमान आणि हिमवृष्टी , वणवे ….अशा घटनांची तीव्रता आणि वारंवारता दरवर्षी वाढत आहे ,
गेली काही वर्षे पृथ्वीच्या विविध भूभागावर घडणाऱ्या टोकाच्या वातावरणीय बदलाच्या घटना, extreme climate events, एकत्र बघितल्या तर त्यातून तयार होणारा पॅटर्न कळेल. त्याचे गांभीर्य कळेल.
काही गोष्टींची नोंद घेतली पाहिजे
१. वातावरणीय बदल तापमान , पाऊस किती मिमी पडला या आकडेवारीत फक्त नाही कळत. कोट्यवधी नागरिकांच्या यातना, त्यांच्या आप्तांचे अकाली मृत्यू , त्यांनी पै पै करून तयार केलेल्या मत्ता , शेती , घरे , गुरे ढोरे यांचे नुकसान , त्यावर मात करण्यासाठी काढलेली कर्जे …..हे सारे दोन चार दिवस मेनस्ट्रीम येते तेवढेच. मायबाप राज्यकर्त्यांबद्दल कोण काय बोलणार
२. वातावरणीय बदलातून होणाऱ्या मृत्यूना , नुकसानीला अर्थात वर्गीय आयाम आहे. शहरी भाग असू दे नाहीतर ग्रामीण. तेथील गरीब , निम्न मध्यमवर्गीय कायमचे जीवनातून उठतात. त्याचा अर्थ असा की आपत्ती नंतर त्यांना फक्त शासनच मदत करू शकते. एनजीओ वगैरे चान्गले काम करतात. पण एनजीओना सर्वार्थाने मर्यादा आहेत.
३ क्लायमेट चेंज हा असा प्रश्न आहे की तो जगातील राष्ट्रे समुदायिकपणेच सोडवू शकतात. एकेकटे राष्ट्र आपल्यापुरता सोडवू शकतच नाही. त्यासाठी सौहार्द आणि परस्पर विश्वास हवा. आपले , आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य एकत्रितपणे गुंफलेले आहे ही परिपक्व जाणीव हवी. आणि आजच्या जागतिक ताणतणावाच्या युगात गेल्या काही वर्षात या विषयावर जे काही साध्य केले गेले होते ते वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. उदा ट्रम्प यांची अमेरिका UNFCC या युनोच्या क्लायमेट चेंज परिषदेतून बाहेर पडली आहे
४ ऊर्जेच्या वापरातून हवेत जाणाऱ्या कार्बन एमिशन्स आणि वातावरण बदलाचा जैव संबंध आता प्रस्थापित झाला आहे. ऊर्जा वापरली जाणार. पण तंत्रज्ञान एवढे नक्कीच प्रगत आहे की प्रत्येक किलो कॅलरी ऊर्जा जाळल्यानंतर कमीतकमी कार्बन हवेत जाईल. पण ते साध्य करायचे तर भांडवली खर्च आणि रनिंग कॉस्ट वाढते, नफ्याच्या मार्जिन्स कमी होतात.शेयरचे भाव हवेतसे वाढत नाहीत इत्यादी. याचे नियमन करणारे रेग्युलेटर्स / भ्रष्टाचार आपल्याला माहित आहेत.
५ गेली ३० वर्षे हा प्रश्न जागतिक व्यासपीठांवर गंभीर पणे चर्चिला जात आहे. पण जागतिक कॉर्पोरेट भांडवल , नेहमीच्या पद्धतीने , आपदा मे अवसर म्हणून , या अरिष्टाकडे गुंतवणूक आणि नफा कमावण्याच्या संधी म्हणून बघत आहे. जगात क्लायमेट फायनान्सिंग साठी खाजगी भांडवलासाठी नेपथ्यरचना केली जात असते. बोलबाला झालेल्या कार्बन क्रेडिट उद्योगातून नक्की काय रिझल्ट्स मिळाले. कोणीही सांगणार नाहीत
वातावरण बदल / क्लायमेट चेंजचा मुद्दा पृथ्वीच्या , अर्थव्यवस्थेच्या सर्व दारांवर धडका मारत आहे ; आपण सामुदायिकपणे मनाची कवाडे बंद करून बसलो आहोत ; सर्व दारे / खिडक्या / भिंती तोडून तो घुसणार हे नक्की. घुसेल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल.
हायसे वाटणारी गोष्ट म्हणजे हे असे टीकात्मक लिहिणारे , वाचणारे अनेक जण या जगात नसतील. म्हणजे सुटतील. राख / माती झालेले असतील. राख / मातीला कोठे असतो गिल्ट वगैरे
ज्या पुढच्या पिढीला काही न करण्याचा ऑप्शन राहणार नाही ती पिढी काहीतरी करेलच. करताना आपल्याला शिव्या घालेल. राख / मातीला कोठे शिव्या अंगाला लागतात





