Pune News : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते, पुणे शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव साळवे यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व महाड चवदार तळे संग्राम शताब्दी वर्ष अभिवादन तसेच “पुढील वाटचाल” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी माजी आमदार ॲड. जयदेवराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना आंबेडकरी चळवळीच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. देशात संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात संविधानाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीची अपेक्षित मूल्ये अद्याप पूर्णत्वास आली नसल्याचे सांगत त्यांनी जातीआधारित राजकारणामुळे तळागाळातील मागास समाज सत्तेपासून दूर राहिल्याचे नमूद केले. धनदांडगे आणि सत्ताधारी वर्गाच्या वर्चस्वामुळे दलित-मागासवर्गीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, आंबेडकरवादी विचारवंतांनी सध्याची राजकीय कोंडी फोडण्यासाठी एकत्रितपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तीमुळे दलित राजकारण कमजोर होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
या व्याख्यानमालेत ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुभाष वारे आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. शारदा वाडेकर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल आण्णा जाधव होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंतराव साळवे हे आंबेडकरी चळवळीतील ज्ञानाचा अखंड झरा असून कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान असल्याचे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे संयोजन नागेश भारत भोसले यांनी केले. याप्रसंगी रोहिदास गायकवाड, रमेश राक्षे, अंकल सोनवणे, सचिन बगाडे, आकाश साबळे, अरविंद तायडे, शैलेंद्र चव्हाण, दिलीप कुसाळे, सचिन बनसोडे, सुदीप गायकवाड यांसह मोठ्या संख्येने आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते.





