नांदेड : मराठी साहित्यात सामाजिक जाणीवा, परिवर्तनवादी दृष्टिकोन आणि मानवी मूल्यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या ‘अंतरीचे दीप’ या सर्जनशील साहित्यसंग्रहास यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी, लातूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. हा साहित्यसंग्रह सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. माधव हैबतकर यांनी लिहिला आहे.
अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतरीचे दीप’ हा दर्जेदार आणि विचारप्रवर्तक साहित्यसंग्रह असून पुरस्कार निवड समितीने सर्वानुमते त्याची निवड केली आहे. या साहित्यकृतीने समकालीन जीवन वास्तव प्रभावीपणे उभे करत वाचकांना नवी प्रेरणा दिल्याने साहित्य क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी लातूर येथे आयोजित अकादमीच्या दुसऱ्या साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि प्रशस्तीपत्र असे आहे.
या यशाबद्दल डॉ. माधव हैबतकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. अशोक सोनी, उपाध्यक्ष सतीश झरकर, सचिव ओमप्रकाश डागा, कोषाध्यक्ष डॉ. किशोर मंत्री, तसेच बी. रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास सोनवणे, विविध साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही डॉ. माधव हैबतकर यांना साहित्य क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.






