परभणी : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी येथे सुरू असलेल्या आर्थिक व प्रशासकीय अनियमिततांबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी पत्राद्वारे हे निवेदन दिले आहे.
विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंदर्भात 8 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित झालेल्या वृत्ताचा तसेच शासन निर्णयांचा उल्लेख करून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (MCAER), पुणे यांनी संबंधित अनियमिततांचा अहवाल कृषी मंत्रालयाकडे सादर केला असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही अधिकाऱ्यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून नियुक्त्या व पदवाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यामध्ये विशेषतः विद्यापीठातील काही पदांवर नियमबाह्य पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा उल्लेख असून, संबंधित व्यक्ती या सर्व अनियमिततांमध्ये सहभागी असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा नियम व इतर कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 22 एप्रिल 2026 पासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी, दलित, आदिवासी संघटनांच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत राज्यपाल, मुख्य सचिव, लोकायुक्त तसेच कृषी विभागाला देखील पाठविण्यात आली आहे.





