उत्तर प्रदेश : लखनौ शहरातील विकासनगर परिसरातील सेक्टर ११ मध्ये लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण वस्तीत हाहाकार माजवला आहे. काही क्षणांतच भडकलेल्या ज्वाळांनी २०० हून अधिक झोपड्यांना वेढा घालत त्यांना पूर्णपणे भस्मसात केले.
या आगीत सुमारे १,००० पेक्षा अधिक नागरिक बेघर झाले असून अनेक कुटुंबांचे आयुष्यभराचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या भागात मुख्यतः स्थलांतरित कामगार राहत असल्याने त्यांच्या उपजीविकेवरही मोठा परिणाम झाला आहे.
आग इतकी वेगाने पसरली की रहिवाशांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तातडीने दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पीडितांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






