वसई-विरार : पोलीस ठाणे हे कायद्याचे आणि संविधानाचे केंद्र असून ते कोणत्याही विशिष्ट धर्माचे प्रार्थनास्थळ नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत वंचित बहुजन महिला आघाडीने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयावर निवेदनाद्वारे प्रश्नांचा भडिमार केला आहे.
पोलीस प्रशासनात वाढते धार्मिक हस्तक्षेप, प्रशासकीय आवारात उभारली जाणारी मंदिरे आणि भोंदूगिरीला मिळणारे अप्रत्यक्ष खतपाणी याविरोधात संघटनेच्या वसई-विरार अध्यक्षा गीता जाधव यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जाहीर निषेध नोंदवला आहे. (Stop Superstition)
या निवेदनात प्रशासकीय कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. सध्या समाजात अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांकडून सर्वसामान्यांची फसवणूक होत असताना, ज्या प्रशासनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आहे, तेच प्रशासन श्रद्धेच्या नावाखाली संविधानाची पायमल्ली करत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
Also Read : गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ६ एप्रिलला नागपुरात ‘नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन
अनेक पोलीस ठाण्यांच्या आवारात किंवा थेट आतमध्ये उभारण्यात आलेली मंदिरे ही शासकीय तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, हे भारतीय संविधानाच्या कलम २७ चे थेट उल्लंघन असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. (Stop Superstition)
पोलीस ठाण्यांमध्ये होणारे सार्वजनिक धार्मिक उत्सव आणि त्यात पोलीस अधिकाऱ्यांचा वाढता सहभाग यामुळे एका विशिष्ट विचारधारेला प्रोत्साहन मिळत असून, इतर धर्मीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असा इशाराही महिला आघाडीने दिला आहे.
जेव्हा पोलीस अधिकारी स्वतः कर्मकांडांमध्ये गुंतलेले दिसतात, तेव्हा त्याचा फायदा समाजात वावरणारे भोंदू बाबा घेतात आणि “प्रशासन आमच्या पाठीशी आहे” असा चुकीचा संदेश जातो, असेही पत्रात नमूद केले आहे. (Stop Superstition)
Also Read : श्रीगोंदा आगारातील ‘बोगस बिल’ प्रकरणाची चौकशी; वंचितच्या ‘अर्धनग्न’ आंदोलनानंतर प्रशासन नमले
यावेळी गीता जाधव यांनी एक अत्यंत महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर कोणत्याही ईश्वराची मूर्ती नसून ‘भारतीय संविधानाची उद्देशिका’ (Preamble) कोरलेला भव्य शिलालेख बसवण्यात यावा. एखादा पीडित किंवा शोषित माणूस अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी येतो, तेव्हा त्याला ‘आम्ही भारताचे लोक…’ हे शब्द अधिक धीर देतील आणि आपल्याला धर्माच्या नव्हे तर संविधानाच्या आधारावर न्याय मिळेल याची खात्री पटेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (Stop Superstition)
Also Read : Gas Cylinder Shortage : गॅस तुटवड्यावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्ला
वंचित बहुजन महिला आघाडीने या निवेदनाद्वारे सात दिवसांच्या आत योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यामध्ये आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमधील धार्मिक स्थळे आणि प्रतिमा हटवणे, केवळ राष्ट्रीय सण साजरे करणे आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणे अशा मागण्यांचा समावेश आहे. (Stop Superstition)
या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासन या गंभीर विषयावर आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






