अहमदनगर : घारगाव येथे विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर झालेल्या भ्याड हल्ल्याने राज्यातील लोककलावंतांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा कलेला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांवरच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तमाशा फडाचे वाहन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबले असताना काही समाजकंटकांनी गाडी आडवी लावून अडवली. यानंतर फडातील महिला कलाकारांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत ड्रायव्हरने शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला उत्तर म्हणून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे तमाशा फडातील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Ahmedabad News)
ही घटना केवळ एकाकी नसून, राज्यभरात यात्रा आणि जत्रांच्या काळात तमाशा फडांना अशा प्रकारच्या त्रासाला वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या गावात जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या या कलावंतांना स्थानिक पातळीवरील काही गावगुंडांकडून अपमानास्पद वागणूक आणि असुरक्षितता सहन करावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. (Ahmedabad News)
तमाशा ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आत्मा आहे. मात्र, या कलेमागे उभे असलेले कलाकार आजही उपेक्षित आणि असुरक्षित जीवन जगत आहेत, ही कटू वस्तुस्थिती आहे. ज्या कलाकारांच्या कलेवर समाज टाळ्यांचा वर्षाव करतो, त्यांच्याच सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील ग्रामस्थ, यात्रा समित्या आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन तमाशा फडांना ठोस सुरक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून अशा समाजकंटकांना वचक बसवावा, अशी मागणी लोककलावंत समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्यासह विविध स्तरांतून केली जात आहे. (Ahmedabad News)
“कलावंत सुरक्षित असेल, तरच कला टिकेल आणि कला टिकली, तरच संस्कृती जिवंत राहील,” असा ठाम संदेश देत या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.






