– राजेंद्र पातोडे
काल नागपुरात संघाच्या मुख्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाबद्दल भाजप आध्यात्मिक आघाडीच्या कथित प्रमुख टुकार भोसले ह्याने गरळ ओकली आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मोर्चावर टीका करताना भोसले यांनी ज्या भाषेचा वापर केला, ती राजकीय अपरिपक्वता दाखवणारी आहे. ज्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे भान नाही आणि जे केवळ ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या जोरावर बोलतात, त्यांनी इतरांच्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर बोलणे म्हणजे मोठ्ठा ‘राजकीय विनोद’ आहे.
टुकार भोसले ह्याची स्टँड-अप कॉमेडी फेसबुकवर दिसली, ती देखील कमेंट बंद करून… आज जगभरात गंभीर घडामोडी घडत आहेत. एपस्टीन फाईल्समध्ये जगातील बड्या नेत्यांची नावे येत असताना, त्यात भारतीय संदर्भातील चर्चांवर भाजप आणि संघ गप्प का? मोदी, पुरी आणि अंबानी यांचे नावाबाबत आरोप होत आहेत. इराणसारख्या भारताच्या मित्र राष्ट्रावर हल्ले होत असताना, भारताचे परराष्ट्र धोरण आज अमेरिका आणि इस्रायलच्या दबावाखाली, एपस्टीन फाईल्समुळे मुके-बहिरे झाले आहे.
“विश्वगुरू” होण्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान आज महत्त्वाच्या जागतिक संघर्षात नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, हे देशाला का सांगत नाहीत? डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे म्हटले की, “भारत-पाक संघर्ष मी थांबवला आणि मी मोदींचे राजकीय भवितव्य संपवू शकतो.” हे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
अशा वेळी ‘देशभक्ती’चा आव आणणाऱ्या संघ आणि भाजपच्या नेत्यांना ‘धाड भरली आहे का?’ देशाच्या सार्वभौमत्व गहाण ठेवून ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान हटविला पाहिजे, ह्या मागणीसाठी कालचा मोर्चा होता. त्यात वंचित बहुजन आघाडीबरोबर काँग्रेस आणि डावे पक्ष सहभागी होते. त्यात वल्गना काय आहे?
बाळासाहेबांनी मोर्चा जाहीर केला आणि पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. पदाधिकारी, कार्यकर्ते ह्यांना नोटीस देऊन, नजरकैदेत ठेवून, नाक्यावर वाहने अडवून आणि संपूर्ण नागपूरला अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त लावूनदेखील मोर्चा काढण्यात आला आहे. ही खरी भाजपवाल्यांची मूळव्याध आहे.
बरं, मोदींची राजकीय कारकीर्द संपवू शकतो असे बोलणाऱ्या ट्रम्पच्या विधानाचा निषेध करण्याचे धाडस भोसले कडे नाही. कारण त्याला भीती आहे की, आयर्लंडच्या राष्ट्रप्रमुखाला जसे सैन्य पाठवून उचलून नेले, तसे टुकार भोसले यांनाही उचलले जाईल. कदाचित ह्या भीतीपोटी तोंड शिवले असावे.
भोसले यांनी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघ शाखा भेटीची लोणकढी थाप मारली आहे. डॉ. बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीचे दहन केले आणि ज्या विचारसरणीला कडाडून विरोध केला, त्याबद्दल भोसले चकार शब्द काढत नाहीत. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून आपली ‘राजकीय पोळी’ भाजण्याचे काम भाजपचे हे उथळ प्रवक्ते करत आहेत.
बाळासाहेब आंबेडकर हे केवळ वारसा सांगितला नाही, तर त्या वारशातील ‘लढवय्येपणा’ जिवंत ठेवून लढत आहेत. म्हणून त्यांनी थेट संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला आहे. त्या आधी सुजात आंबेडकर देखील औरंगाबादमध्ये मोर्च्याने संघाच्या शाखेवर जाऊन संघाला देशाच्या धर्मादाय कायद्याअनुसार नोंदणी करून घ्या, हे सांगून आले आहेत—ह्याचा विसर पडू देऊ नका.
कालचा मोर्चा संघाच्या मुख्यालयावर काढण्याचे प्रयोजन एवढेच होते की, संघाने दिलेल्या पंचसूत्रीत मोदींचे वर्तन योग्य आहे का, हे विचारणे होते. कारण संघाचे पाचवे सूत्र ‘नागरी कर्तव्य’ असे सांगते की, स्वयंसेवकांनी आणि नागरिकांनी आपली कर्तव्ये ओळखून नियमांचे पालन करणे, देशासाठी निष्ठावान असणे आवश्यक आहे. तर मग मोदी हे स्वतःला स्वयंसेवक म्हणून सांगत असतील, तर आता त्यांच्या राष्ट्रनिष्ठा विषयावर संघाने निर्णय घेऊन त्यांना हटविले पाहिजे, ही मोर्चाकऱ्यांची मागणी होती.
मोर्चा अडवला असला, तरी संघाच्या मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांनी तसे निवेदन देऊन पोहोच घेतली आहे. खरे मोर्चाचे गांभीर्य न समजूनदेखील निगरगट्ट पद्धतीने टीका करणे हा संघाच्या कार्यकर्त्यांचा स्थायीभाव आहे. नागपूरच्या मोर्चाचा उद्देश लोकशाही वाचवणे, देशाचे सार्वभौमत्व आणि संविधानावर होणारे आक्रमण थोपवणे हा होता.
भोसले याला ‘स्टंटबाजी’ म्हणतात, कारण त्यांना जनआक्रोशाची भीती वाटते. वंचित बहुजन आघाडीने नेहमीच वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला आहे. सत्तेच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांना हा संघर्ष कधीच समजणार नाही.
तुषार भोसले यांनी आंबेडकरांच्या ‘अस्तित्वाचे आत्मपरीक्षण’ करण्यापूर्वी, स्वतःच्या पक्षाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गमावलेला दबदबा आणि ट्रम्प यांच्या विधानावर बाळगलेले मौन यावर आत्मपरीक्षण करावे. मोर्चा कशासाठी होता हे न वाचता प्रतिक्रिया देणे, हीच खरी ‘राजकीय दिवाळखोरी’ आहे.
जाब विचारण्यासाठी जर निवडणुकीत यश हाच एकमेव निकष असेल, तर १९५२ साली जनसंघाचे केवळ ३ खासदार होते. १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये फक्त २ खासदार होते. मग सत्ता स्थापन होईपर्यंत जनसंघ आणि भाजप देशात आंदोलन करत नव्हते का? असले बालिश निकष लावून तुलना करण्याची दुर्बुद्धी सुचते कुठून?
विशेष म्हणजे, संघाच्या राष्ट्रकार्याची उंची मोजण्याची कुवत ह्यावर देखील मनोरंजक दावा टुकार भोसले यांनी केला आहे. त्यांनी संघावरील बंदी आणि सरदार पटेल यांची पत्रे वाचून बौद्धिकात भर घालून घेतली पाहिजे.
विशेष म्हणजे, अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने आपल्या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रॉ वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याची चिंता भोसलेंनी करावी.






