औरंगाबाद : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (ABVP) शहरात करण्यात येत असलेल्या विद्रुपीकरणाविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराच्या स्वच्छतेला बाधा पोहोचवणाऱ्या या कृत्याबद्दल संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी युवा वंचितच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
नेमका प्रकार काय?
गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतील भिंतींवर JOIN ABVP आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा आशयाचे मोठे मजकूर रंगवण्यात आले आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य खराब होत असून स्वच्छ शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवा वंचितने केला आहे.
पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खासगी भिंतींवर अनधिकृतपणे रंगकाम केल्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विद्रुपीकरण करणाऱ्या ABVP च्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे नोंदवण्यात यावेत आणि जिथे जिथे भिंती रंगवण्यात आल्या आहेत, त्या पूर्ववत स्वच्छ करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छ शहराचे चित्र या विद्रुपीकरणामुळे बदलत आहे. नियमांचे उल्लंघन करून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. असे युवा वंचित आघाडीकडून मत व्यक्त करण्यात आले आहे.
निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष राहुल मकासरे, अभिमन्यू अंभोरे, शहर उपाध्यक्ष निलेश बनकर, रवी मिसाळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






