नागपूर : कोंढाळी येथील विकास नगर (प्रभाग क्र. १३) भागात मागील २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना अद्यापही मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. ही मागणी मार्गी लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काटोलचे उपविभागीय अधिकारी चिवंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
मागील 20 वर्षापासून नगरपंचायत कोंढाळी अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १३, विकास नगर येथील नागरिक गावठाण हद्दीतील जागेवर गेल्या दोन दशकांपासून वस्ती करून राहत आहेत. आपल्या हक्काच्या जागेचा पट्टा मिळावा यासाठी हे नागरिक अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. या सततच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Vanchit bahujan aghadi)
नागरिकांच्या या मूलभूत मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. शासनाने नियमानुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्याला तातडीने मालकी हक्काचा पट्टा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (Vanchit bahujan aghadi)
या प्रसंगी जिल्हा कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने, तालुकाध्यक्ष वसंत मडके, सतीश पाटील, पवन तागडे, जीवन गायकवाड, वाहने सर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






